रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील राजकारणाचा गेल्या दोन महिन्यातील उलथापालथ आणि घडामोडींनी जिल्ह्यातील राजकारणातही मोठय़ा प्रमाणावर परिणाम झाला असून त्यातून पूर्वी सूर जुळलेल्या अनेक नेत्यांचे सूर आता बिघडणार असल्याचे चित्र आहे. विशेषत: निवडणूकपूर्वी झालेले पक्षांतर आणि निवडणुकीनंतरचे सत्तांतर अनेकांचा राजकीय जिवनात परिणाम करणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सर्वत्र भाजपची चलती होती. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजप-शिवसेना युतीलाच बहुमत मिळेल व हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे चित्र असल्याने निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यात काँग्रेसमधून तत्कालीन जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्यासह अनेक पदाधिका:यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तर आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीच्या घडामोडीतच उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनीही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या दरम्यान सर्वात मोठी राजकीय घटना घडली ती म्हणजे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व चंद्रकांत रघुवंशी यांची 25 वर्षापासूनची राजकीय दुष्मनी संपली आणि ते एकमेकांचे मित्र झाले. ही मैत्री इतकी घट्ट की काहीही झाले तरी एकमेकांपासून दूर न जाण्याचा संकल्प त्यांनी जाहिरपणे व्यासपीठावरूनही बोलून दाखविला. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाला मोठा फायदा होईल अशी सर्वानाच आशा लागली आहे. या पाश्र्वभुमीवर निवडणूक निकालानंतर युतीला बहुमत तर मिळाले पण सरकार स्थापन करतांना मात्र ही युती तुटली. व ज्या काँग्रेसला सोडून कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले ती काँग्रेस मात्र राज्यात सत्तेत येणार आहे. ज्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात निवडणूक काळात कार्यकर्ते नव्हते ती राष्ट्रवादी देखील आता सत्तेत येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात घालून घेण्यासाठी अनेक नेते पुढे सरसावत असल्याचे चित्र आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी मात्र भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश केल्याने ते फायदेशीर ठरले आहेत. शिवसेनेत प्रवेशाने मात्र जिल्ह्यातील राजकारणातही अनेक परिणाम जाणवणार आहेत. एरव्ही त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून एक वेगळी छाप होती. आता मात्र काँग्रेसचा काही स्थानिक नेत्यांशी सूर जुळवतांना कसरतच होणार आहे. विशेषत: त्यांच्या राजीनाम्याने प्रभावी झालेले आमदार अॅड.के.सी.पाडवी यांचा विरोधात अक्कलकुवात शिवसेनेचा उमेदवार असल्याने रघुवंशींनी पाडवींना हरविण्यासाठी पुर्ण शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीत निश्चितच दरार आला आहे. नंदुरबारमध्ये रघुवंशी व गावितांचे मनोमिलन झाले असले तरी राज्याच्या सत्तेत भाजप विरोधात राहणार असल्याने ही मैत्री टिकविण्यासाठीही त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. खास करून नुकत्याच होणा:या जिल्हा परिषद निवडणुकीत ही कसब पणाला लागणार आहे. उदेसिंग पाडवी काँग्रेसमध्ये आले असले तरी स्थानिक स्तरावर पद्माकर वळवी यांच्याशी जुळवून घेण्यात त्यांना कसरत करावी लागणार आहे. किंबहुना त्यांच्या नात्यातील कुणकूण सुरू झाली आहे. एकुणच जि.प. निवडणुकीच्या राजकारणात या सा:या बाबींचा परिणाम होणार असल्याने आता हे राजकारण कसे वळण घेते त्याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
पक्षांतर आणि सत्तांतराच्या प्रक्रियेत नेत्यांचे बिघडले सूरताल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:37 IST