यंदा मार्च महिन्यापर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेलाही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे, याचा थेट परिणाम त्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासावर होण्याची भीती पालकांना आहे. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होताना अभ्यासक्रम कसा वेळेत पूर्ण करणार, असा प्रश्न शिक्षक,प्राध्यापक ही करीत होते. कोरोनामुळे विद्यार्थी आरोग्याला प्राधान्य देत राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे, जूनमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साहजिकच यांचा निकाल प्रचलित पद्धतीनुसार ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे. नेहमीच्या पदवी प्रवेशाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा अंदाज घेतल्यास तोपर्यंत निम्म्याहून अधिक प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते ; मात्र यंदा ती सुरूच सप्टेंबरमध्ये होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्य सीईटी परीक्षाचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे बदलण्यात जरी आले तरी जेईई, नीट सारख्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियांचे काय? असा प्रश्न पालक व विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.
दहावी, बारावीच्या लेट परीक्षांचा फटका केवळ पदवी परीक्षांना नाही तर दहावी नंतरच्या आयटीआय, पॉलिटेक्निक अशा अभ्यासक्रमांना ही बसणार आहे. त्यामुळे एक तर शासनाने देशभरातील प्रवेश प्रक्रियासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकच धोरण राबविण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा शैक्षणिक राज्य मंडळाच्या परीक्षांना विलंब झाला तरी त्याचे प्रवेशाचे शैक्षणिक कॅलेंडर बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
कृती आराखडा तयार करणे आवश्यक
शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी या सर्व घोळावर एकत्रित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत पालक व्यक्त करीत आहेत. दहावी, बारावी परीक्षा पुढील नियोजनानुसार वेळेवर झाल्याच तर ऑनलाईन मूल्यांकन, निकालाचा कालावधी, प्रवेश प्रक्रियेचा कालावधी यात कपात करून शैक्षणिक वर्ष सुरळीत करता येते का? यावर अभ्यास करणे आणि आतापासून कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे मत पालक व तज्ज्ञांनी मांडले.