लक्कडकोट ही नवीन वसाहत धारणाजवळ वसली आहे. या ठिकाणी साधारण ७० ते ८० कुटुंबे राहतात; परंतु सात वर्षांनंतरही येथे वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे गावठाणात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हे गावठाण खर्डी खुर्द ग्रामपंचायतीत येते. येथून जवळच रोझवा लघुसिंचन प्रकल्प असल्यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी जंगली श्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे रहिवासीही जीव मुठीत घेऊन राहत आहेत. वास्तविक हे गावठाण सपाटीवर वसलेले आहे. लक्कडकोट गावात जागा उपलब्ध नसल्यामुळे ही कुटुंबे आपल्या शेतशिवारात कुडाची घरे करून राहत होते. तेथे सुविधा उपलब्ध होत नसल्याने ही कुटुंबे येथे धरणाजवळील सपाटीवर राहत आहेत. मात्र सुविधांबाबत सर्वांनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गावठाणात विजेची सोय करावी यासाठी त्यांनी यापूर्वीही वीज वितरण कंपनीच्या तळोदा कार्यालयाकडे अर्ज केला होता. तथापि, तत्कालीन प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले नाही. त्यामुळे पुन्हा वसाहतीत विजेची सोय करून मिळावी यासाठी उपकार्यकारी अभियंता सुहास चहांदे यांची भेट घेतली. त्यांना ग्रामस्थांनी निवेदनही दिले आहे. लवकरात लवकर या गावठाणात वीजपुरवठा उपलब्ध करावा, अशी मागणी केली.
या निवेदनावर लक्कडकोट गावठाणातील बिरसा क्रांती दलाचे राजेंद्र पाडवी, संजय पाडवी, कुवरसिंग वळवी, सुरेश पाडवी, सुनील पाडवी, तापसिंग पाडवी, दिनेश वळवी, जालमसिंग पाडवी, राजू पडवी, आदींसह सर्व वसाहतधारकांच्या सह्या आहेत. दरम्यान, तळोदा वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता सुहास चहांदे यांनी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव करावा. जेणेकरून तातडीने कार्यवाही करता येईल. त्यामुळे ठराव आणण्याचे त्यांनी ग्रामस्थांना सूचित केले.
धरणाच्या पायथ्याशी वसाहत
लक्कडकोट येथील ग्रामस्थांची घरे ही पूर्वीपासूनच स्वतःच्या शेतात होती. प्रत्येकाची कुटुंब संख्या वाढल्याने शेतात घरेही वाढली. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने जमीन कमी होऊन उदरनिर्वाह करण्याइतकेही उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे गेल्या सात-आठ वर्षापासून धरणाच्या पायथ्याशी लक्कडकोट ही नवीन वसाहत निर्माण केली आहे. सध्या त्या ठिकाणी ६० ते ७० घरांची वस्ती आहे. परंतु अद्यापही विजेची सोय नाही. त्यामुळे या समस्येबाबत ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.