जयनगर : मार्च २०२० पासूनच्या कोरोना महामारीमुळे मध्यंतरीचा तीन-चार महिन्यांचा कालावधी वगळल्यास अजूनही सर्व मंदिरे बंदच आहेत. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे शासनाने मंदिर उघडण्याबाबत अजूनही काहीही निर्णय न दिल्यामुळे २७ जुलै मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तरी नवस फेडता येणार का? याविषयी भक्तांच्या मनामध्ये साशंकता असून, धार्मिक कार्यक्रमांवर पोट भरणाऱ्या लोकांचे हाल झाले असून, सर्व आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.
कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने नोव्हेंबर २०२० मध्ये निर्बंध आखून देत मंदिरे उघडण्याचा निर्णय दिला होता. मात्र चार महिन्यांच्या कालावधीनंतर मार्च महिन्यात पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्यामुळे शासनाला नाईलाजास्तव सर्व मंदिरे पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हापासून मंदिरे बंदच असून, सर्व सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. त्यामुळे जयनगरसह परिसरातील तसेच मध्य प्रदेशवरून येणारे सर्व भाविक येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तरी जयनगर येथील मंदिरात आपल्याला नवस फेडता येईल का? अशी शंका भक्तांच्या मनामध्ये आहे.
यावर्षी मार्च महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीला जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्दचे आदेश दिल्यामुळे भक्तांना जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात व जिल्ह्यातील इतर गणपती मंदिरात नवस फेडता आला नव्हता. वर्षातून केवळ एक किंवा दोन अंगारकी चतुर्थीचा योग येतो. मात्र, यावर्षी आता दुसऱ्या अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. योगायोगाने यावर्षी दोन अंगारकी चतुर्थीचा योग असला, तरी भक्तांना कोरोनाच्या या महामारीमुळे मंदिरे बंद असल्यामुळे हिरमोड सहन करावा लागत आहे. तसेच कोरोना काळात जयनगरसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने विवाह सोहळे पार पडले आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर जवळजवळ सर्वच नवदाम्पत्य जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात सत्यनारायणाची पूजा ठेवत असतात. मात्र नवदांपत्यांनाही मंदिरात सत्यनारायण करता न आल्याने घरीच साध्या पद्धतीने सत्यनारायण करावा लागला.
पुढील महिन्यात ९ ऑगस्टपासून श्रावण महिना चालू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर जयनगर येथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी येत असतात. यामध्ये अनेक भक्तगण, नवदाम्पत्य दर्शनासाठी, तर अनेकजण नवस फेडण्यासाठी येत असतात. मात्र, प्रशासनाने मंदिरे खुले करण्याबाबत अजून कुठलाही निर्णय न दिल्यामुळे सलग दुसऱ्या अंगारकी चतुर्थीला व श्रावण महिन्यात जयनगरसह जिल्ह्यातील विविध मंदिरांत दर्शन व नवस फेडणार्या भाविकांसह धार्मिक कार्यक्रमांवर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरे बंद असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांत अभिषेक, पूजन, प्रसादाचे साहित्य, खेळणीची दुकाने, नाश्त्याची दुकाने, फूल विक्रेते, नारळ विक्रेते यासारख्या व्यावसायिकांवर खूप मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे दरवर्षी जयनगरसह परिसरातील अनेक शेतकरी फूलहारासाठी लागणारी झेंडूची फुले लावत असतात. मात्र, कोरोना काळात मंदिरांबाबतची स्थिती पाहता, शेतकऱ्यांनी फूल लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे.
जयनगर येथील हेरंब गणेश मंदिर अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे फूल विक्रेते, नारळ विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील भाविक दर्शनासाठी येत नसल्यामुळे रिक्षाचालकांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तसेच श्रावण महिन्यात मंदिरे उघडतील की नाही? याबाबत अनिश्चितता आहे.
- किशोर दंगल माळी, सदस्य, हेरंब गणेश ट्रस्ट, जयनगर.