नंदुरबार : भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील वादाची प्रकरणे कायमच असून काही बाबतीत गुन्हे देखील दाखल झाले आहेत. याबाबत घरमालकांनी योग्य काळजी घेतली व नियमांनुसार सर्व व्यवहार केल्यास भविष्यात आपली मालमत्ता सुरक्षित रहाण्यास मदत होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
भाडेकरू आले आणि मालक झाले. असे प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. सहसा जे घरमालक वयोवृद्ध आहेत, ज्यांना कुणीही वारस नाहीत अशांबाबतीत असे प्रकार घडत आहेत. याशिवाय मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाईन झाल्याने तसेच घरमालकांसह भाडेकरूंमध्ये देखील कायद्यांबाबत जागृती झाल्याने, या क्षेत्रातील गुन्हेगारी कमी झाल्याने घरे बळकावण्याचे प्रकार पूर्वीपेक्षा कमी झाले आहेत. परंतु, काही भाडेकरू किरायेदार म्हणून येतात आणि स्वत:ला घरमालक समजू लागतात.
कब्जाचे प्रकार कमी...
n नंदुरबारात अशा प्रकारची प्रकरणी यापूर्वी मोठ्या संख्येने घडत होती. शहरात यापूर्वी काहीजण पैसे घेऊन घर खाली करण्याचे काम करत होते. त्यातून मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेच्या घटना देखील घडत होत्या.
n यापूर्वी शहरात मोक्याची घरे, जागा ही भाड्याने घेणे व काही दिवसांनी त्यावरच आपला हक्क सांगण्याचे प्रकार देखील वाढले होते. त्यामुळे नागरिक आता स्वत: काळजी घेऊ लागले आहेत.
n पावसाळ्यात पालिका पडक्या इमारतींना नोटिसा बजावते. अशा इमारती खाली करण्यासाठी इमारती मालक तयार असतात. परंतु त्यातील भाडेकरू निघत नसल्याने मोठी समस्या निर्माण होते. नंदुरबार व शहाद्यात असे प्रकार दरवर्षी आढळून येत असतात.