शहरामध्ये काही भागांमध्ये वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असतो. हा वीज पुरवठा वेळीच सुरळीत करण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. भीम नगर तसेच एकलव्य नगर या परिसरामध्ये दिवसा आणि रात्री-अपरात्रीदेखील वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी सांगूनही वेळीच वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. विशेष म्हणजे शहरातील वीज कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करत असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांची वाट बघावी लागत असल्याचेही वेळोवेळी अनुभवास आले आहे. शहरात अनेक भागामध्ये ओव्हरलोड असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, त्या परिसरातील ओव्हरलोड कमी करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ते नियोजन केल्यास शहरात वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अक्कलकुव्यात अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST