१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे लेखी परीक्षांसाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो आहे. त्याच शाळेत त्याची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वर्गखोल्यांची कमतरता जाणवेल त्यांची व्यवस्था लगतच्या परीक्षा उपकेंद्रात करण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेच्या वेळी कोरोनाची लक्षणे विद्यार्थ्यांमध्ये आढळल्यास त्यांची जून महिन्यात ठराविक ठिकाणी विशेष परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. यासाठी तालुकास्तरावर मोजकी परीक्षा केंद्र असतील. याबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर होणार आहे.
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने बोर्डाने लेखी परीक्षेचा कालावधीत वाढ केली आहे. ८० गुणांच्या पेपरसाठी तीन तासाऐवजी साडेतीन तासांचा वेळ असेल. ४० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढविली आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक पेपरसाठी २० मिनिटे वेळ अधिक असेल.
परीक्षेच्या तारखात बदल
१२ ते २८ एप्रिल दरम्यान १० वी तर ५ ते २२ एप्रिल या कालावधीत १२ वीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, यावर्षी १० वीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार नाहीत तर लेखी परीक्षेनंतर १० वीच्या विद्यार्थ्यांना २१ मे ते १० जून या कालावधीत लेखन कार्य सादर करावे लागणार आहेत.
१२ वीच्या विद्यार्थ्यांची २२ मे, १० जून या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होईल. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यंदा कमी झाल्याने पाच ते सहा प्रात्यक्षिकांवर परीक्षा घेतली जाईल. याबाबत लवकरच माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्डाकडून दिली जाणार आहे.