शहादा : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, सायंकाळी सात वाजल्यानंतर संचारबंदीची कडक अंमलबजावणी करावी आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी दिले आहेत. शहादा तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, येत्या २० दिवसात किमान २० हजार ॲन्टिजेन चाचण्या करण्यात याव्यात. शहरातील व्यावसायिकांच्या चाचण्या प्राधान्याने करण्यात याव्यात, चाचण्यांना विरोध करणाऱ्यांची दुकाने बंद करण्यात यावी. ॲन्टिजेन चाचण्यांसाठी किमान सहा स्वतंत्र पथके स्थापन करण्यात यावीत. शहरात गर्दी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये. मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. कोरोनाबाधितांची संपर्क साखळी शोधण्यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पाटील यांनी शहरातील व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना कोरोनाविषयक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.