जिल्ह्यात प्रामुख्याने २ लाख ९५ हजार हेक्टरवर सरासरी खरीप पेरणी करण्यात येते. यासाठी ९६ हजार मेट्रीक टन खते आणि मिश्र खते मागवण्यात येतात. यातील युरियासह इतर रासायनिक मिश्र खतांची गेल्या काही वर्षात टंचाई जाणवत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा खतांच्या वितरणाकडे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान गेल्या वर्षापासून खतांचे दर हे १० ते २० टक्के वाढल्याचे समोर आले होते. यात यंदा पुन्हा दरांमध्ये वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. यातून शेतकरी नियोजनात व्यस्त झाले आहेत.
इंधन दरवाढ परिणामकारक
जिल्ह्यात मागवण्यात येणारे खत हे प्रामुख्याने रेल्वे रॅकने येते. परंतु हा रॅक केवळ दोंडाईचा येथे येतो. यामुळे दोंडाईचा येथून रस्ते वाहतुकीने खते आणली जात होती. वाहतुकीसाठी होणारा खर्च वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच भागात खतांचे दर वाढणार असल्याची माहिती आहे.
मशागतही महागणार
अद्याप खरीप हंगामाचे नियोजन सुरु आहे. प्रत्यक्षात येत्या मे महिन्यापासून शेती मशागतीच्या कामांना शेतकरी सुरुवात करतील. तत्पूर्वी खर्च वाढल्याचे समोर आल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. बहुतांश शेतकरी आता ट्रॅक्टरद्वारे मशागत करत असल्याने वाढीव खर्चाचा बोजा पडणार आहे. डिझेलचे दर वाढल्याने शेत मशागत करणेही महागच पडणार आहे. यात आता मिश्र खतांचे दर वाढत असल्याने समस्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्याप खतांचा साठा आलेला नसला तरी येत्या काळात साठा आल्यावर दरवाढ नक्की असल्याचा दावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५२८ खते व बियाणे विक्रीची दुकाने असून त्यांच्याकडे वेळोवेळी कृषी विभागाचे पथक तपासणी करुन माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
खतांचे दर आतापासूनच वाढत असल्याने चिंता आहे. शासनाने खत दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तरी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. येत्या हंगामात महागाई शेतकऱ्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
-कृष्णा मोतीराम मराठे,
शेतकरी, रांझणी ता. तळोदा.
आधीच शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाला आहे. त्यात आता खतांच्या दरवाढीचे संकट आहे. यातून छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होणार आहे. कर्जाचा बोजाही वाढू शकतो. खत दरवाढीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
-गणपत लेहऱ्या पावरा,
शेतकरी,रोझवा पुर्नवसन ता. तळोदा.
आधीच आपल्याकडे खतांचा नियमित पुरवठा होत नाही. शेतकरी अडचणीत येतात. यात आता खतांची दरवाढ होणार असेल तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे. साठेबाजांमुळे खतांचा बाजार वर्षभर तेजीत ठेवला जातो.
-महेंद्र दामोदर भारती,
शेतकरी, रांझणी ता. तळोदा.