सध्या उन्हाळा सुरू झाला असून या उन्हाच्या तीव्रतेत पाड्यांवर टाकलेले नादुरुस्त हातपंप अधिक भर टाकत आहेत. बंद पडलेल्या हातपंपांमुळे सातपुड्यातील तोरणमाळ परिसरातील लेघापाणी, कोटबांधणीसह इतर पाड्यांवर प्रशासनाने याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येऊनही कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गम भागातून वाहणारे नदी व नाल्याचे पाणी आटल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. तोरणमाळ रस्त्यावरील पाड्यांवर ठिकठिकाणी नादुरुस्त झालेल्या हातपंपांची दुरुस्ती करून पाणीटंचाईतून सुटका करण्याची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुर्गम भागातील याठिकाणी पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे. नदी-नाले पूर्णपणे कोरडे झाल्याने महिलांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागात नाल्यांंमध्ये केलेल्या झऱ्यामधून पाणी आणावे लागत आहे. हे झरे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी वेळ लागत असल्याने उन्हातान्हात महिला त्याठिकाणी बसून राहत असल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाईग्रस्त पाड्यांची संख्या वाढतच जाणार असल्याने प्रशासनाने पाड्यांवर हातपंप दुरुस्तीचे पथक पाठविण्याची मागणी आहे. तसेच नव्याने हातपंपांची निर्मिती करण्यासाठी सर्वेक्षण यंत्रणा राबविण्याची गरज असल्याचे दुर्गम भागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
देशी जुगाड करून भागवताहेत तहान
सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील हातपंप नादुरुस्त झाल्याने येथील स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी नादुरुस्त हातपंप देशी जुगाड करून दुरुस्ती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे येथील नागरिकांना अजबगजब फंडा वापरत हातपंपदुरुस्ती करून घ्यावी लागत आहे.