नंदुरबार : मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जेमतेम राहत असली तरी अनेक वेळा तेच अपक्ष मुख्य लढत असलेल्या उमेदवारांना डोईजड ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन निवडणुकांचा विचार करता २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रमुख दोन उमेदवारांमधील विजयाचे अंतर ४०,८४३ मतांचे होते तर केवळ दोनच अपक्ष उमेदवारांनी यापेक्षा जास्त अर्थात ४१ हजार ३ मते घेतली होती.प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात असतात. कधी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून काही पदरी पाडून घेणे तर कधी दुर्लक्षीत केले गेल्यामुळे संबधीतांना आपली ताकद दाखवून देणे हा त्यामागील उद्देश असतो. काही वेळा समाज, संघटना किंवा पक्षातील अंतर्गत वाद देखील अपक्ष उमेदवारास उभे करण्यास कारणीभूत ठरतात.नंदुरबार लोकसभा मतदार संघातील गेल्या दोन वेळच्या लढतींचे चित्र पहाता अपक्षांमुळे निवडून येणारा उमेदवार पडल्याचे चित्र दिसून येते.२००९ मधील निवडणुकीत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि भाजप उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगली होती. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार समाजवादी पार्टीच्या उमेदवारापेक्षा केवळ ४० हजार ८४३ मताधिक्यांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत केवळ दोनच अपक्ष उमेदवार असतांना दोघांनी विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा अधीक अर्थात ४१ हजार ३ मते मिळविली होती. त्यावेळी समाज फॅक्टर अपक्ष उमेदवाराच्या कामी आला होता. परिणामी अपक्षांनी घेतलेली मते पराभूत उमेदवाराचे नुकसान करणारी ठरली होती.२०१४च्या निवडणुकीत एकुण तीन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तिघांनी मिळून १९ हजार ५७६ मते मिळविली होती. परंतु या निवडणुकीत अपक्षांची लाभ-हाणी फारसी जाणवली नाही. कारण मोदी लाटेत विजयी उमेदवाराचे मताधिक्य लाखावर अर्थात एक लाख ६ हजार ४८६ इतके होते.या निवडणुकीत तब्बल सात उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.
अपक्षांच्या मतांमुळे प्रमुख उमेदवारांना मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 21:26 IST