नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून बाजार समितीत भाजीपाला आवक वाढली आहे. यामुळे दरांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. मेथी, कोबी, फ्लावर, पालक यासह विविध भाज्यांचे दर घसरल्याचे दिसून आले आहे. बाजारात वाटाण्याच्या शेंगांची मोठी आवक असल्याने त्यांचेही दर घसरल्याची माहिती देण्यात आली आहे. दर घसरल्याने शेतक-यांना फटका बसत आहे.
पथदिवे बंद असल्याने नागरिकांची नाराजी
नंदुरबार : शहरातील गुरव चाैक ते गुरुकुल चाैफुलीदरम्यान नवीन रस्त्यावर लावलेले पथदिवे बंदच आहेत. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गाने मोठ्या संख्येने नागरिक रात्री व पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी जात असतात.
बसेसला थांबा देण्याची मागणी
नंदुरबार : शहरापासून लांब अंतरावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आता वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाले आहे. यातून या ठिकाणी वर्दळ वाढणार आहे. यामुळे नाशिक मार्गाने येणा-या तसेच जाणा-या सर्व बसेसला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी केवळ साध्या बसेस थांबत असल्याने जिल्हा रुग्णालयात येणा-यांचे हाल होत आहेत.
वाहनांमुळे त्रस्त
नंदुरबार : शहरातील तळोदा रोडवरून बायपास रोडकडे वळण घेणा-या वाहनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. सीबी पेट्रोलियम जवळून वळणारी वाहनांचा वेग कमी होत नसल्याने अपघाती स्थिती निर्माण होते. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी थांबूनही अवजड वाहनांचा वेग कायम असतो.
रस्ते दुरुस्तीची मागणी
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील वैंदाणे, शनिमांडळ, तलवाडे यासह विविध गावांच्या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आहे. जिल्हा परिषदेने येथील रस्त्यांचे खड्डे भरण्यासह साईडपट्ट्या दुरुस्तीची कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस ठाण्यामुळे व्यक्त होतेय समाधान
नंदुरबार : तालुका पोलीस ठाण्याची इमारत भालेर रस्त्यालगत बांधण्यात आली होती. काही वर्षांपासून पडून असलेल्या या इमारतीत तालुका पोलीस ठाणे सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या असून पोलीस ठाण्यामुळे आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या भुरट्या चो-या आणि मद्यपींकडून केला जाणारा धिंगाणा थांबला असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शेतक-यांना मदत देण्याची अपेक्षा
बोरद : गेल्या काही महिन्यांपूर्वी बोरदसह परिसरात चक्रीवादळ व अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झाले होते. यातून घरे आणि पिकांना बाधा पोहोचली होती. यातील नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने भरपाईची मागणी आहे.
शेतक-यांना भरपाई देण्यासाठी पाठपुरावा
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतक-याने लागवड केलेल्या टरबुजाचे बियाणे हे निकृष्ट असल्याने त्यांना फटका बसला आहे. या शेतक-याला शासनासह संबंधित कंपनीकडून भरपाई करून देण्याची मागणी आहे.
रस्ता काम पूर्ण झाल्याने समाधान
नंदुरबार : वाका ते नंदुरबारदरम्यान रस्ता काम पूर्ण झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेवाळी ते नेत्रंग महामार्ग म्हणून परिचित असलेल्या या रस्त्यावरचे खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत होते. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नव्हती. दरम्यान या रस्त्याच्या कामास निधी मंजूर झाल्याचे वृत्त लोकमतने प्रथम दिले होते. यानंतर प्रशासनानेही काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना आदेश दिले होते. यानुसार नंदुरबार शहर हद्दीत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे येथून प्रवास करणा-यांचे होणारे हाल थांबले आहेत.