अनेक तालुक्यातील शेती सिंचनाच्या सुविधा नसल्याने वरच्या पावसाच्या पाण्यावरच शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध शेती योजनांसाठी मिळणारे अनुदान अत्यंत कमी असल्याने ते त्यांना परवडणारे नाही.
जगात व देशात कोरोना या महामारीमुळे अनेक व्यवसाय बंद पडले. त्यामुळे अनेक लोकांना व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. या वर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे महाडीबीटी या पोर्टलवर लॉटरी पद्धतीने निवड करून दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांपासून अनेक शेतकरी वंचित राहत आहे. कृषी अनुदान वाढवून देण्यात यावे यासाठी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी नंदुरबार, कृषी अधिकारी नंदुरबार यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.