नंदुरबार : शहरात पाणी टंचाईची कुठलीही समस्या गेल्या दहा वर्षात निर्माण झाली नाही. दर एक दिवसाआड पाऊण ते एक तास शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. परंतु अद्यापही शहरात एकुण घरांच्या तुलनेत आठ ते दहा टक्के अवैध नळ कनेक्शन असल्याचे चित्र आहे. पालिकेने वारंवार आवाहन करूनही ते नळ कनेक्शन अधिकृत केले जात नसल्याची स्थिती आहे. आता २४ तास पाणी पुरवठा योजना राबविली जाणार असून नुकतेच वॅाटर ॲाडीट देखील करण्यात आले आहे.
नंदुरबार पालिकेर्फे शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. २५ टक्के पाणी पुरवठा हा आंबेबारा धरणातून केला जातो. शहरातील लोकसंख्या व घरांची संख्या लक्षात घेता दर एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. तांत्रिक समस्या वगळता शहरात कधीही पाणी टंचाई निर्माण झालेली नाही. २०४० च्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन शहरात नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेली आहे. आता लवकरच वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत २४ तास नळांना पाणी राहणार आहे. त्यासाठी मिटर सिस्टीम लावली जाणार आहे. अर्थात सद्या आहे त्या घरपट्टीच्या तुलनेतच मिटरद्वारेही पाणी मिळू शकेल असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासाठी नुकतेच त्रसस्थ संस्थेतर्फे शहरात वॅाटर ॲाडिट देखील करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेला आता गती देण्यात येणार आहे.
दोन वर्षांपासून नंदुरबारचा विरचक प्रकल्प हा ९० टक्केपेक्षा अधिक भरत आहे. त्यामुळे शहरवासी पाण्याबाबत सुदैवी ठरत आहेत. अर्थात प्रकल्प केवळ ४० टक्के भरलेला असतांनाही पालिकेने नियोजनपूर्वक पाणी पुरवठा केेल्याने त्यावेळी देखील पाणी टंचाई निर्माण झालेली नव्हती. अवैध नळ कनेक्शन धारकांनी आपले कनेक्शन वैध करून घेतले आणि थकीत पाणी पट्टी नियमित भरली तर पालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात नवीन योजनेत अवैध नळ कनेक्शन हे उघडकीस येणार आहेतच असेही बोलले जात आहे.
८ टक्के अवैध नळजोडणी...
शहरात जवळपास दहा टक्के घर मालकांनी अवैध नळ जोडणी घेतले असल्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे. अशा जोडणी धारकांना वेळोवेळी आवाहन करून जोडणी वैध करून घेण्याचेही आवाहन करण्यात आलेले आहे.
n शहरातील अनेक मालमत्ता धारकांनी मालमत्ता करासह नळ पट्टी देखील थकविल्याचे चित्र आहे. वास्तविक पालिकेने कम्प्लीशन व नॅान कम्प्लीशन असलेल्या घरांना सारखीच नळपट्टी आकारलेली आहे. अ वर्ग पालिका असूनही सर्वात कमी नळीपट्टी आकारणारी खान्देशातील नंदुरबार एक पालिका आहे.
कोट....
पाणी पुरवठाबाबत नंदुरबारक जनता सुदैवी आहे. राज्यात सर्वत्र पाणी टंचाई असतांना नंदुरबारात नियमित पाणी पुरवठा होत होता. यंदाही विरचक प्रकल्प तुडूंब भरला आहे. त्यामुळे चिंता नाही. असे असले तरी अवैध नळ कनेक्शनमुळे पालिकेचा महसूल बुडतो. शिवाय वेळेवर पाणी पट्टी देखील अनेकजण भरत नाहीत. याबाबत जनतेने मानसिकता बदलणे आवश्यक आहे. लवकरच वाढीव पाणी पुरवठा योजना अंमलात येणार आहे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा,नंदुरबार.