सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहिले जाते. अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध होणारी रिक्षा सर्वसामान्यांना प्रवासासाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, ठराविक अंतरावर प्रवाशांची वाहतूक, घरगुती सामानाची वाहतूक, वेळप्रसंगी रुग्णालयात जाण्यासाठी प्रामुख्याने रिक्षाचा वापर सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातो. रिक्षाचा व्यवसाय किफायतशीर असल्याने अनेक शिक्षित तरुणांना रोजगाराचा प्रमुख आधार ठरला आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक बेरोजगारांनी रिक्षा व्यवसाय करण्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी चौकाचौकात सहजगत्या रिक्षा उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे ठरले आहे.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अगोदरच गेल्या वर्षभरापासून या संकटामुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आला होता. आता कुठेतरी स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती. पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आता जगायचे कसे? असा सवाल रिक्षावाल्यांना छळतो आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत रिक्षावाल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपयांची मदत वर्ग करण्याचे जाहीर केले आहे. याचा फायदा अल्प प्रमाणात असला तरी ज्या रिक्षाचालकांची नोंदणी नाही अशांनी आता करायचे काय? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे. सरसकट प्रत्येक रिक्षाचालकाला शासनाने दीड हजार रुपये अनुदान देण्याची गरज असल्याचे मत रिक्षाचालक व्यक्त करीत आहेत.
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. व्यवसाय करण्याची इच्छा असताना साथ मिळाली नाही. अशा परिस्थितीत मित्रांकडून उसनवार पैसे घेऊन रिक्षा घेतली. दिवस-रात्र मेहनत करून कुटुंबीयांचे पोट भरत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प होणार असल्याने आता पुन्हा करायचे काय असा प्रश्न छळतो आहे.
-नितीन कश्यप, रिक्षाचालक, शहादा
कोरोना विषाणू संकटामुळे गेल्या वर्षभरापासून प्रचंड हाल झाले आहे. रिक्षा विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज थकले आहे तर त्यावरील व्याजाचा डोंगर वाढला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने जाहीर केलेली मदत सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत अल्प आहे.
-पिंटू चौधरी, रिक्षाचालक, शहादा
बँकेकडून कर्ज घेऊन रिक्षा घेतली व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू केली. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा व खाजगी क्लासेस बंद असल्याने व्यवसाय झाला नाही. अशा परिस्थितीत थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावला आहे. शासनाने अल्प मदत जाहीर करण्याऐवजी थकीत कर्जावरील व्याज माफी दिली पाहिजे. रिक्षा चालक जगण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
-दीपक जव्हेरी, रिक्षाचालक, शहादा