विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही व विशेष म्हणजे धडगाव सारख्या अतिदुर्गम भागातील बिजरी या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या एकमेव शिक्षिका कविता पाटील यांना औरंगाबाद येथे झालेल्या राज्यव्यापी उपक्रमात राज्याचे शालेय मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. या वेळी औरंगाबादचे सीईओ मंगेश गोंदवले, विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांसह राज्यातील ४०० शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून या ऑनलाइन ॲपचे ऑफलाइनमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. या वेळी बच्चू कडू म्हणाले की, कोरोना काळात सर्वकाही बंद असताना फक्त दवाखाने आणि ऑनलाइन शिक्षण सुरू होते. देशाची पिढी घडविणारा शिक्षक हाच खरा देशाचा रक्षक आहे. ऑनलाइन पाठात सर्वात जास्त लाईक आणि व्ह्यूवर्स असलेल्या शिवरायांचे बालपण या ऑनलाइन पाठाच्या वेळी प्रत्यक्ष शिवनेरीवर जाऊन पाठ घेणाऱ्या व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभूती देणाऱ्या संजय रणदिवे या शिक्षकाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.त्यांनी सर्वच शिक्षक व शिक्षिका याचे अभिनंदन केले. या वेळी पुरस्कार मिळालेल्या शिक्षिका व गटविकास अधिकारी जयंत बाबरे, गटशिक्षणाधिकारी वसंत मनवरकर, पंचायत समिती सभापती कविता बोरेकर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रूपराव सावरकर, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, केंद्रप्रमुख राजीव खोजरे यांनी सर्वांचे कौतुक केले.
संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना या महामारीमुळे जग थांबूनच गेले होते. पण, त्याच काळात घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा. जिल्हा परिषद लाईव्ह शिक्षण या उपक्रमांनातर्गत मुले शाळाबाह्य होऊ नये व ती कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावी, यासाठी घरातूनच मुलांसाठी रोज शैक्षणिक पाठांचे लाईव्ह सादरीकरण केले जात होते. त्यात राज्यातील अनेक शिक्षिकांसोबत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिजरी या जिल्हा परिषद शाळेची एकमेव शिक्षिका कविता पाटील यांनीही भाग घेतला होता. व त्यांनादेखील औरंगाबाद येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.