हार, कंगन व नारळ बनविण्यासाठी दरवर्षी कुटुंबीयांना शंभर ते सव्वाशे पोती साखर लागते. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागणी निम्म्यावर आली असून, ग्राहक माल घेण्यास धजावत नाहीत. शहरात ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने बाजारातून कंगन, हार व नारळाची विक्री कमी होत आहे. कोरोनासदृश परिस्थिती लक्षात घेता व्यावसायिकांनी यावर्षी ५० ते ६० पोती साखरेपासूनच वस्तू बनविल्या असून, तरीही पाहिजे तशी मागणी होत नाही. निदान सणासुदीच्या काळात तरी या व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रशासनाने मुभा द्यावी. वर्षभरातून फक्त महिनाभर हा व्यवसाय चालतो, अन्य महिन्यांत हा व्यवसाय नसतो. त्यामुळे वर्षभर रिकामे राहून एकाच महिन्यात व्यवसायातून वर्षभराचा उदरनिर्वाह करावा लागतो, अशी खंत शेख कुटुंबीयांकडून व्यक्त होत होत आहे.
-गुढीपाडवा व होळी सणानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून हार, कंगन व इतर गोड पदार्थ बनवीत आहोत. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. वर्षभराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच अवलंबून असतो.
-शब्बीर हाजी नासीर शेख, व्यावसायिक, शहादा