नंदुरबार : जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये धान्य मालाची आवक ४० टक्क्यांवर आली आहे. भावदेखील स्थिर आहेत. कोरोना आणि लाॅकडाऊन याचा परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितींमधील उलाढाल गेल्या महिनाभरापासून मंदावली आहे. सद्यस्थितीत सरासरी आवकच्या केवळ ४० टक्के धान्यमालाची आवक होत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार या सर्वात मोठ्या बाजार समितीत सध्या केवळ ओल्या मक्याची आवक सर्वाधिक अर्थात दीड हजार क्विंटलपर्यंत आहे. त्या खालोखाल गहू ५०० क्विंटल, भुईमूग शेंगा ४०० तर ज्वारीची ३०० क्विंटलपर्यंत दैनंदिन आवक होत आहे. शहादा बाजार समितीमध्येही अशीच स्थिती आहे. ओला मकाला १४०० ते १६०० रुपये क्विंटल भाव आहे. गहू १६०० ते २२०० रुपये क्किंटल, भूईमूग शेंगा तीन हजार ते ५२०० रुपये क्विंटल तर ज्वारीला १७०० ते ३२०० रुपये भाव आहे.
धडगाव व अक्कलकुवा बाजार समितींमध्ये तर शुकशुकाट आहे. कोरोना, संचारबंदीच्या परिणामांसह हंगाम संपत आल्याने ही स्थिती असल्याचे नंदुरबार बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले.