लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा अर्धशतकापर्यंत गेल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एकाच कुटूंबातील सहा जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. याशिवाय तळोदा येथे मुंबई येथून आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नंदुरबार व हिंगणी येथील दोन जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातूून डिस्चार्ज देण्यात आला आहे.खान्देशात नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मर्यादीत होता. सर्वत्र नंदुरबार पॅटर्नची चर्चा होत असतांना गेल्या चार ते पाच दिवसात ११ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा सक्रीय झाली आहे. कोरोनाचा फैलाव आणखी वाढू नये यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.अर्धशतकी आकडा...जिल्ह्यात कोरोनाचा दुप्पटीचा वेग हा किमान १४ ते १८ दिवस होता. नंतर त्याचा कालावधी पुन्हा कमी होऊन १० ते १२ दिवसांवर आला आहे. गेल्या चार दिवसात तब्बल ११ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वच रुग्ण नंदुरबार शहरातील आहेत. त्यात सुरुवातीला आढळलेला मच्छी बाजारातील रुग्ण, पीडब्ल्यूडी वसाहतीतील रुग्ण नंतर त्याच रुग्णाच्या कुटूंबातील सहा जण, राजीवगांधी नगर, गाझी नगरातील तसेच जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचारी असे ११ रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांच्या संपर्कातील लोकांना निष्पन्न करून त्यांना संस्थात्मक तसेच घरगुती विलगीकरण करण्यात आले आहे. ज्यांच्यात थोडीफार लक्षणे दिसून आली त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.मुंबई रिटर्न महिलेचा मृत्यूमुबंईहून परतलेल्या ७५ वर्षीय महिलेच्या मृत्यूमुळे तळोद्यात एकाच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणेने दखल घेत महिलेच्या ४० वर्षीय मुलासह ११ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.मृत महिला ५ जून रोजी मुंबई येथून परतली होती. तिची आरोग्य तपासणी करण्यात आली होती व तिला होम कॉर्टाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तीन, चार दिवसांपासून त्या महिलेला ताप, खोकला व श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबियांनी तिला तळोदा शहरातील तीन खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. परंतू काल शुक्रवारी संध्याकाळी त्या महिलेला त्रास अधिकच वाढला व रात्री दीड वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. महिलेने उपचार घेतलेल्या दवाखान्यात तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी स्वत: जाऊन महिलेला होणाऱ्या त्रासाविषयी माहिती जाणून घेतली.मृत महिलेच्या मुलाची कोरोना तपासणीचा रिपोर्ट नंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सुरत येथून शहरात अथवा तालुक्यात इतर ठिकाणी येणाºया नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आणि कुठलेही लक्षण असतील तर आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वजण एकमेकांशी संपर्क करुन माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नंदुरबार येथील मुंबई रिटर्न कोरोनाग्रस्ताचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. या व्यक्तीच्या संपर्कातील त्यांचे वडिल देखील कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय हिंगणी येथील मुंबई रिटर्न कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील व्यक्तीवरही उपचार सुरू होते. त्यांचा देखील दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने ते देखील कोरोनामुक्त झाले. त्यांनाही जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.