नंदुरबार : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी व आष्टे पंपिंग स्टेशनवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपुरवठासारख्या आवश्यक सेवेच्या ठिकाणी नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केली आहे.
नंदुरबार शहराला विरचक धरणातून झराळी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी एक्स्प्रेस फिडरदेखील बसविण्यात आले आहे. पंपिंगसह येथे जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील आहे; परंतु नियमित वीजपुरवठ्याऐवजी या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे पाणी पंपिंगला अडथळा ठरतो. त्याचा परिणाम शहरातील जलकुंभ भरण्यास वेळ लागत आहे. परिणामी, शहरातील त्या त्या भागातील अर्थात झोननुसार पाणीपुरवठासाठी वेळापत्रक विस्कळीत होत आहे.
हीच स्थिती आष्टे पंपिंग स्टेशनची देखील आहे. येथून शहरातील ३० टक्के भागात पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणीदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी, शहरातील जलकुंभ भरण्यास वेळ लागत आहे.
वीज कंपनीने पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी केली आहे.