नंदुरबार : मे महिन्यात अंत्योदय व लाभार्थी रेशनकार्डधारक कुटुंबांना दोनवेळा रेशन मिळणार आहे. त्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून तसेच राज्य सरकारने जाहीर केल्याने नियमित महिन्याचे धान्यही मोफत मिळणार आहे. त्यामुळे संचारबंदीमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
शासनाने कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदी कालावधीत अंत्योदय अन्नयोजना आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात रास्त भाव दुकानावर वितरीत होणारे धान्य मोफत देण्यात येणार आहे. संचारबंदी कालावधीत अनेकांसमोर रोजगाराच्या समस्या असल्याने गरजू नागरिकांसाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यास दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ तर अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटुंबास १२ किलो तांदूळ आणि २३ किलो गहू मोफत देण्यात येणार आहे.
कोट..
संचारबंदीमुळे रोजगार गेला आहे. त्यामुळे कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता आहे. शासनाने जाहीर केेलेले रेशनवरील मोफत धान्य तातडीने उपलब्ध झाल्यास थोडाफार आधार मिळू शकतो. त्यासाठी लवकरच हे धान्य मिळावे अशी अपेक्षा आहे.
-दिनकर जाधव, लाभार्थी.
शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही मे महिन्यात मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मे महिन्याचे नियमित धान्यही मोफत मिळणार असून त्याच्या वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आले असून लवकरच वाटप करण्यात येईल. -महेश शेलार,
जिल्हा पुरवठा अधिकारी.