नंदुरबार : दिवसेंदिवस सोशल मीडियाचा गैरवापर वाढत आहे. वेळोवेळी पोलिसांकडून आवाहन करण्यात येत असलेतरी नागरिकांची फसगत होत असल्याचे समाेर आहे. मोठ्या शहराप्रमाणे नंदुरबारसारख्या भागातदेखील हे प्रकार कायम आहेत. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. तर अनेकांचे फेक काॅलच्या माध्यमातून बँकेतून पैसे लंपास होण्याचे प्रकार घडले आहे.
फेक कंपनीकडून काॅल येऊन नागरिकांना आमिश दाखविले जाते. त्यातून ओटीपी दिल्यावर बँकेतून पैसे गायब होतात. ही संख्या कमी वाटत असलीतरी नंदुरबार जिल्ह्यासारख्या आदिवासी दुर्गम भागात ही संख्या तशी मोठीच आहे. सोशल मीडियाचा सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. बँक अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत पैसे परस्पर वर्ग केल्याच्या घटनांनी यावर्षी कहरच केला आहे. तर एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात परस्पर पैसेदेखील वर्ग झाल्याचे समोर आले आहे.
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये कंपनीच्या नावे बँक खाती उघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
फेसबुकवरून विविध जाहिरातींच्या आडून ठग नागरिकांना स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून गंडा घालतात. त्याला अनेकजण बळी पडत असतात. तशी उदाहरणे घडली आहेत.
फेक अकाऊंटच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक करायची, पुढे गोपनीय माहिती, अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करणे हे प्रकार वाढले आहेत.