कोरोना संकटाच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे वितरण वेळेवर करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील १०६३ रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ९३ हजार ९८० कुटुंबांना ९४३ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), १३ हजार १५४ क्विंटल भरडधान्य, १८ हजार ७९६ क्विंटल तांदूळ आणि ९४० क्विंटल साखरेचे वितरण करण्यात आले.
याच कालावधीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत एक लाख ३८ हजार ८८३ कुटुंबांना ७४९ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), ११ हजार २८३ क्विंटल भरडधान्य आणि १८ हजार २१० क्विंटल तांदळाचे वितरण करण्यात आले. विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर अन्नधान्य मिळत असल्याने संकटाच्या काळातही कुटुंबातील सदस्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे.
एप्रिल महिन्यातही नेहमीच्या अल्प दरानुसार अन्नधान्य वितरण होणार असून मे महिन्यातील अन्नधान्य मोफत मिळणार आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानदाराला कोणतेही शुल्क न देता आपले मे महिन्यातील अन्नधान्य घेता येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.