लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महामार्गावर स्वस्तिक पेट्रोल पम्प जवळील गॅरेज मधील वाहन आणि टायरला भल्या सकाळी आग लागुन लाखोचे नुकसान झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना शनिवारी घडली.नवापूर शहरात महामार्ग लगत असलेल्या स्वस्तिक पेट्रोल पम्पाजवळील टायर दुकानात विक्रीला असलेल्या जुने टायरांना सकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. टायरांना लागलेल्या आगी मुळे जवळच असलेल्या गॅरेजमधे दुरुस्तीसाठी आलेल्या चार वाहनांनी क्रमाक्रमाने पेट घेतला. त्यात चारही वाहने जळून खाक झालीत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळी व्यायामाच्या इराद्याने फिरणारे नागरिक व परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेउन आगीवर नियंत्रण मिळवले. जवळच पेट्रोल पम्प असल्याने मोठा अनर्थ टळला.नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका चारचाकी वाहनाचे काच फोडून ते वाहन बाजूला करून आगीपासून वाचवण्यात नागरिक यशस्वी झाले. नागरिकांनी पालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यासाठी पालिकेच्या टोल फ्री क्रमांक व पंपहाऊस वरील क्रमांक लावले असता दोन्ही क्रमांक बंद मिळुन आल्याने नागरिकांनी अग्निशामक वाहन येईस्तव मिळेल त्या साधनांचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक बम्ब वेळेवर उपलब्ध झाला असता तर नुकसानाची तिव्रता कमी झाली असती असा सुर नागरिकांमधुन व्यक्त झाला. सामाजिक कार्यकर्ते विजय सैन यांनी अग्निशामक वाहनाच्या चालकाच्या खाजगी मोबाईल वर संपर्क करून वाहन बोलावल्याने अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आली. तोवर चार वाहन आणि विक्री साठी असलेले टायर जळून खाक झाल्याने पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार कडाक्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी लावलेल्या शेकोटीमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नवापुर पोलीसात अग्नि उपद्रवाची नोंद घेण्यात आली आहे.
गॅरेजमधील टायरांना आग लागून दुसरूस्तीला आलेली चार वाहने खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:39 IST