जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागासाठी पाच अद्ययावत ईटीएस (इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन) उपलब्ध झाले असून विभागाच्या कामकाजात त्यामुळे गती येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडे पूर्वी एकही ईटीएस यंत्र नसल्याने वनहक्क दावे, राष्ट्रीय महामार्ग, मोजणी कामकाज आदी बाबतचे संपादन कामकाज पारंपरिक प्लेन टेबलने केले जात होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नवे यंत्र प्राप्त झाल्याने नियमित मोजणी कामकाजा सोबत खनिकर्म, वनदावे, सरदार सरोवर प्रकल्प बाधितांचे पोट हिस्सा सर्वेक्षण, पुनर्वसन मोजणी कामकाज आणि संपादनाचे मोजणी कामकाज गतिमान होणार आहे.
जिल्ह्यातील ड्रोन सर्वेक्षणासाठी देखील गावठाण हद्द बंदीच्या कामकाजात ईटीएस यंत्र महत्त्वाचे ठरणार असून कार्यालयाच्या कार्यक्षमतेतही भर पडणार आहे. हे यंत्र प्राप्त झाल्यानंतर महेश खडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूकरमापक यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंत्राची पाहणी करून त्यांचा कार्यक्षमतेने उपयोग करण्याच्या सूचना यावेळी केल्या.
प्रशिक्षणास सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे,
उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, बबन काकडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.