नंदुरबार : जानेवारी ते मे या काळात तब्बल ९ रुपयांनी वाढ झालेल्या डिझेल दरांमुळे किराणा मालाचे दर ही वेळोवेळी वाढले आहेत. त्याचा फटका सामान्यांना बसत असून किराणा दरात ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढ झाल्याने घराघरांतील आर्थिक बजेट काेलमडले आहे.
देशात गेल्या काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेल दर हे सातत्याने वाढत आहेत. त्यातून डिझेलचे दर आजघडीस हे दर ८९.६६ एवढे झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यात आयात केल्या जाणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचे दर हे सातत्याने वाढत आहेत. राज्याच्या एका टोकाला दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र हे मर्यादित आहे. यातून अत्यावश्यक अशा ९० टक्के वस्तू ह्या महाराष्ट्राच्या विविध भागांतून किंवा लगतच्या गुजरात आणि मध्यप्रदेशातून व्यापारी मागवितात. यासाठी वाहतुकीचा खर्च केला जातो. हा खर्च वाढीव असल्याने गेल्या काही काळात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर हे नियमितपणे वाढत राहिले. त्यात डाळींपासून खाद्यतेल, धान्य, बेसन, मैदा यासह विविध अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यांत २ ते १० टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ झाल्याने अनेकांनी मासिक किराण्यातच कपात केली आहे. गरज असलेल्या डाळी व खाद्यतेल याच्या खरेदीवर भर दिली जात आहे.
सोयाबीन तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. एक किलो तेल थेट १६५ रुपयांना मिळते. त्यातून बाजारात गेल्यावर तेलाचा खर्च अधिक होतो. तुरीची डाळही १० ते २० रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे अनेक बाबीत कपात होते.
-छायाबाई माळी,गृहिणी, नंदूरबार
प्रथमच शेंगतेलापेक्षा सोयाबीन तेलाचे दर वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल वाढल्याने इतर किराणा मालाचे दरही वाढले आहेत. त्यातून ग्राहकांना फटका बसतो. गरज असल्याने खरेदी करावीच लागत आहे.
-महेंद्र जैन, व्यापारी,नंदुरबार.