लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील खरवड ते मोड दरम्यान असलेल्या नाल्यावरील फरशीचा भराव वाहून गेल्याने परिसरातील १४ गावातील नागरिकांना १५ किलोमीटरचा फेरा मारीत जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे या नाल्याची पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून कोंठवा नाल्यावर फरशी बांधण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांकडून मागणी करण्यात आली होती. परंतु संबंधित विभागाकडून याठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजुने भराव करण्यात येतो त्यामुळे आठ महिने एसटी बसेस व इतर वाहने या मार्गाने ये-जा करीत असतात. परंतु पावसाळ्यात हा भराव वाहून गेल्यास बससेवा बंद होते व या परिसरातील १४ गावांचा तालुका व जिल्ह्याशी होणार संपर्क तुटत असतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकारींनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून कोठवा नाल्यावर नव्याने पुलाची उभारणी करून पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी खरवड, मोड, कळमसरे, कढेल, मोहिदा, धानोरा, छोटाधनपूर, गुंजाळी, उमरी आदी गावातील नागरिकांनी केली आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता पी.जे.वळवी यांनी सांगितले की, या नाल्यावरील कामाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, पावसाळा संपल्यावर काम सुरू करण्यात येईल.
मोड जवळील नाल्यावरील भराव वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:40 IST