अक्कलकुवा तालुक्यामध्ये अक्कलकुवा, खापर, मोलगी, काठी, वडफळी ही पाच वनक्षेत्रे असून केवळ अक्कलकुवा या वनक्षेत्रातील काही भाग शहरी भागात मोडत असून तालुक्यातील सर्वच वनक्षेत्रांचा भाग हा सातपुड्याच्या वन क्षेत्रांमध्ये समाविष्ट आहे. या वनक्षेत्रांमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने सातपुड्यात जिकडे-तिकडे हिरवेगार झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार अधिक वाढला आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यातील डाब गावाच्या परिसरात भर दिवसा दोन अस्वले मुक्तपणे संचार करत असल्याचे दृश्य आढळले होते. या परिसरात शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी या अस्वलांना आरडाओरडा करून पळवून लावले होते. मात्र या वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील पाचही वनक्षेत्रांमध्ये अस्वलांसह इतर हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार अलीकडच्या काळात अधिक वाढल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनक्षेत्रामध्ये असलेला वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार तसेच हिंस्र तसेच उपद्रवी प्राण्यांच्या संचाराबाबत वनक्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी नागरिकांना माहिती देण्याची व सावध करण्याची गरज असताना, या वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वनक्षेत्रामध्ये आपल्या सोयीच्या वेळेनुसार केवळ नावापुरती हजेरी लावून आपले कर्तव्य पार पाडत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नाहक वेळोवेळी जीव गमवावा लागला असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. पावसाळ्यात या वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे तसेच जंगल वाढत असल्यामुळे या वनक्षेत्रामध्ये प्राण्यांसह उपद्रवी प्राण्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार सुरू होतो. या प्राण्यांची वेळोवेळी माहिती मिळवणे व परिसरातील नागरिकांना वन्यप्राण्यांना याबाबत माहिती देऊन त्यापासून सुरक्षिततेचे उपाय करणे याबाबत वन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन होणे आवश्यक असताना, ते होताना दिसत नसल्यामुळे या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांना नाहक बळी पडावे लागते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये आजही वनांची कत्तल केली जात असताना तालुक्यात वन अधिकाऱ्यांमार्फत योग्य कारवाई होताना दिसत नाही. तालुक्यामध्ये लाकूड तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असताना देखील याबाबत संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांना मोबदला तर मिळत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील काही वनक्षेत्र अधिकारी कारवाई करतात, मात्र ती कारवाई गुलदस्त्यातच असते. केलेल्या कारवाईबाबत संबंधित वनक्षेत्र अधिकारी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत असून कारवाईची माहिती लपवण्यासाठी अधिक कटाक्ष बाळगत असल्यामुळे तालुक्यातील वनक्षेत्राच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अक्कलकुवा तालुक्यात हिंस्र प्राण्यांचा संचार वाढल्याने जीवित हानीची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST