साधारण चार महिने कांदा पिकाला पाणी, खत देत त्याच्या संगोपनासाठी परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्यांना पडलेले कांदा दर निराशेच्या गर्तेत ढकलत आहेत. यातून एकरी खर्च आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले होते. कापसाची बोंडे सडून गेली होती. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा पिकाला पसंती दिली होती. मात्र, यंदाही कांद्याचे दर हे वाढीव मिळणार नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. यातून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी तात्पुरती व्यवस्था केली आहे. मुबलक कांदा उत्पादन आलेल्या शेतकऱ्यांनी भाडेतत्त्वावर कांदा चाळ घेऊन कांदा साठा करण्यास सुरुवात केली आहे. आजघडीस व्यापारी देत असलेला भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. लॉकडाऊन असल्याने भाव कधी वाढतील, याचीही खात्री नसल्याचे व्यापारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. यामुळे कांदा साठा करण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी साठ्यावर भर देत आहेत. काही शेतकरी मात्र गरजेपोटी आहेत त्या दरात व्यापाऱ्यांना कांदा देत आहेत.
दर पडल्याने कांदा साठवणूकीवर शेतकरी देताहेत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST