आडवळणावर पडणाऱ्या पावलांना विकासाची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:43 PM2020-02-24T13:43:52+5:302020-02-24T13:44:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विकास कामे व योजनांना नेहमीच कात्री लागल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या वाट्याला डोंगर-उतारावरच्या पायवाटाच आल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विकास कामे व योजनांना नेहमीच कात्री लागल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या वाट्याला डोंगर-उतारावरच्या पायवाटाच आल्या. सर्वत्र आधुनिकता व डिजीटल दुनियेचा डिंडोरा पिटला जात असला काही भाग अथवा घटक अपवाद ठरतात, हा अपवाद या भागात प्रकर्षाने जाणवतो. वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे ठिकठिकाणी आजही झोळीचा अवलंब केला जात आहे. हे कळवट वास्तव तेथील नागरिक अनुभवत आहे.
विकासाच्या दृष्टीने नेहमीच उपेक्षित राहिलेल्या दुर्गम भागाकडे शासन यंत्रणा लक्ष देत नाही. त्यामुळे हा भाग विकासाऐवजी अधोगतीकडेच वाटचाल करीत आहे. विकासासाठी योजना आखल्या जात असल्या तरी योजना राबवणाºया यंत्रणेच्या उदासिन कारभारामुळे योजनांची नेमकी अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे तेथी नागरिकांच्या वाट्याला पायपीटच आली आहे.
धडगाव तालुक्यातील कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पौला येथे आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता बनला असला तरी तेथे वाहतुकीच्या सविधाच सुरू झाल्या नाही. त्यामुळे तेथी नागरिकांना नर्मदा काठापासून कात्रीपर्यंत पायीच प्रवास करावा लागत आहे. पौला येथीलच गारद्या तडवी यांच्या परिवारातील रुग्णाला उपचारासाठी धडगाव येथे नेले जात होते. परंतु वाहतुकीची सुविधाच नसल्यामुळे रुग्णाला नेण्यासाठी पाच जणांची आवश्यकता भासली. पौलापासून कात्रीपर्यंत १४ ते १५ किलोमिटरपेक्षा अधिक अंतर आहे. रुग्णाला कात्रीपर्यंत आणल्यानंतरही वाहन मिळेल याची शाश्वतीच नसल्यामुळे सोबत अनेक जण आले होते. या भागाचा सर्वांगिण विकास व तेथील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य पवाहात आरणण्यासाठी शासनाने विशेष योजना आखल्या पाहिजे. योजनांची प्रतीपूर्ती होईपर्यंत शासनाकडून तेथे नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जीवन जगणे सोपे व्हावे, म्हणून आधुनिकतेतील साधनांचा वापर करण्यात येत आहे. परंतु दुर्गम भागातील या नागरिकांच्या नशिबात ही बाब येऊ शकली नाही. रुग्ण व त्याच्या पालकांच्या सविधेसाठी १०८ ही रुग्णवाहतुक सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु पौला येथे संपर्काची कुठलीही साधने पोहोचली नसल्यामुळे तेथील नागरिक रुग्णवाहिकेसाठी संपर्कच करु शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर बांबूच्या झोळीशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही.