तळोदा : यंदाही शासनाच्या वतीने ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केला असला तरी बालकांनी या शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. हे चिमुकले आजही सुटीच्याच मूडमध्ये आहेत. कारण ते खेळातच त्यांचा संपूर्ण दिवस खर्च करीत असल्याने त्यांना अभ्यासाचा विसर पडला आहे. विशेषत: ग्रामीण भागात हे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे.
कोरोना महामारीमुळे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने यंदाही शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम जून महिन्यापासूनच सुरू केला आहे. मात्र पूर्व प्राथमिक विद्यार्थी या शिक्षणापासून फारच लांब आहेत. कारण त्यांच्या हातामध्येच पालक वर्ग अँड्रॉइड मोबाइल देत नसल्यामुळे ते आपोआपच या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. परिणामी या चिमुकल्यांचा मूड आजही सुटीचाच दिसून येतो. त्यांनी अभ्यासाकडे पाठ फिरवून संपूर्ण दिवस भर खेळातच मन रमवले आहे. विशेषत: ग्रामीण भागामध्ये हे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे.
अक्षर ओळख होईना
कोरोना महामारीमुळे तब्बल दीड-दोन वर्षापासून चिमुकल्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. कारण या विद्यार्थ्यांच्या मनावर आजही ऑफलाइन अभ्यासाचाच प्रभाव अधिक आहे. पालकांनी त्यांचा हातात मोबाइल दिला तरी ते मोबाइलवरील खेळातच रमत असतात. त्यामुळे सद्या तरी ऑनलाइन शिक्षण त्यांच्यासाठी निरुपयोगी ठरले आहे. ग्रामीण भागातील बालकांना तोडके, मोडके वाचन तर जाऊद्या साधे क, ख, ग, घ यासारखे अक्षरही ओळखता येत नसल्याचे काही पालकांनी सांगितले.
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
शासनाने आनलाइन शिक्षणाच्या उपक्रमाबरोबरच इतर अनेक उपक्रम सुरू केले असेल तरी बालकांचा मूड अशा शिक्षणामध्ये नाही, अशा प्रतिक्रिया काही पालकांनी बोलूनही दाखवल्या आहेत.
अ- ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाही.
ब- आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे मोलमजुरी करून उदर निर्वाह करतात. त्यामुळे बालकांच्या शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष होते.
क- ज्या पालकांकडे मोबाइल आहे. त्यांनी शिक्षणासाठी बालकांना मोबाइल दिला तरी त्यातील खेळातच ते रमत असतात.
ड- लहान बालकांना ऑफलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने बालकांचे लहान, लहान गट तयार करून शैक्षणिक उपक्रमावर भर द्यावा.
पाहिली ३१०१२, दुसरी ३१०२१, तिसरी ३१५७० व चौथी ३३२२१.
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
ऑनलाइन शिक्षणास बालकांचा फारसा प्रतिसाद नसला तरी पालकांनी आपल्या चिमुकल्यांची शाळा निदान घरीच घ्यावी असं काही शिक्षण तज्ज्ञांच मत आहे. कारण बाल वय हे अगदी संस्कारक्षम वय आहे. या वयातच त्यांच्यावर संस्कार घातले जात असतात. त्यांना शिक्षणाची गोडी लावली पाहिजे. त्यांना साधे मुळाक्षरे व बाराखडीचे धडे मिळाले नाही तर त्यांचा पायच कच्चा राहून मागे राहतील. निदान त्यांना अभ्यासाची प्रेरणा दिली पाहिजे. अशिक्षित पालकांनीदेखील त्यांना अभ्यास करण्याची सक्ती केली पाहिजे. कारण अशिक्षित पालकांची मुलेही चांगल्या हुद्यावर गेली आहेत. कोरोनाच्या या महाभयंकर स्थितीत आता आपल्यालाही काळानुरूप बदल करण्याची गरज आहे.
घराची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे बालकांना मोबाइल घेऊन देणे शक्य नाही. मोल मजुरी करून जसा-तसा जीवन चरितार्थ सुरू आहे. त्यामुळे आमची मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाही. यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. - सुनीता चित्रकथी, पालक, तळोदा
कोरोना महामारीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. परंतु आर्थिक अडचणीमुळे पालकही त्यांच्याकडे लक्ष घालू शकत नाही. निदान ऑफलाइन शिक्षणासारखे काही उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. - भटू चौधरी, पालक, रजाळे, ता.नंदुरबार