शेतकरीवर्ग विहीर सिंचनातून मे महिन्यातील लावणी करण्यात आलेल्या कापूस पिकाला पुरेशा पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जमिनीतील पाणीसाठा कमी होत असल्याने विहीर सिंचनवरील पिकांना फटका बसविण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांना बागायत क्षेत्रावर दुबार लागवडीचे संकट निर्माण झाले आहे.
खरीप हंगामातील बागायती पिकांमध्ये पपई, मिरची, कापूस, भाजीपाला आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे जमिनी पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर या पिकांना जगवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडत नसून लागवड झालेली पिके करपू लागल्याने नंदुरबार तालुक्यातील शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.