तोरखेडा :- ग्रामीण भागात सद्या एक तासाच्या अंतराने वीज गायब होत असल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. सध्या पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाचा पाराही चढल्याने जनतेची अगोदरच लाहीलाही होत असताना विजेचे अघोषित भारनियमन जनतेला सळो की पळो करून सोडत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तार तुटला आहे, फॉल्ट झाला आहे, वरून बंद केले गेले आहे, असे उत्तर देऊन वेळ मारली जात आहे. वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून कामे आटोपून दुरूस्तीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले असतानाही नेहमी नेहमी फॉल्ट होतोच कसा याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.
शहादा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजवितरणच्या वेगवेगळ्या उपकेंद्रातून जनतेला वीज पुरविली जात आहे. अगोदर उन्हाळ्याचा विचार केला तर कडक उन्हातही विजेचे अघोषित भारनियमन न होता जनतेला घरगुती वापरासाठी वेळेवर वीज उपलब्ध होत गेली आहे. मात्र, उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत नाही तोच विजेचे अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले. यावर्षीच्या मृग नक्षत्रात तर थोडी हवा किंवा पावसाचे आगमन झाले तरी वीज बंद करून जनतेला वेठीस धरले गेले आहे. सद्या गेल्या १० ते १२ दिवसापासून पावसाचा लपंडाव सुरू असून, उन्हाळ्यासारखे ऊन तापत असताना विजेच्या अघोषित भारनियमनात अचानक वाढ झाली आहे. दिवसभरात तर अर्धा वेळ सुद्धा वीज टिकत नसल्याचे दिसून येत आहे. तासातासातून वीज गुल करून फॉल्ट झाला, वरून वीज बंद करण्यात आली, तार तुटला अशी वेगवेगळी कारणे दाखवून वेळेवर वीज भरणाऱ्या ग्राहकांना त्रास दिला जात आहे. मिनिटा मिनिटाने वीज बंद करून अकलेचे तारे तोडणाऱ्या या वीज कंपनीने जनतेची झोप उडवून दिली होती. फक्त वीज वसुली करण्यावर भर देणाऱ्या वीज वितरण कंपनीला सद्या ग्राहकांच्या सोईसुविधांचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे सध्या घडत असलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे.
फ्युज टाकायला ग्रामीण भागात कर्मचारीच नाही
सद्या शहादा तालुक्यात वायरमनची संख्या कमी असल्याने एका वायरमनवर दोन-तीन गावांचा कार्यभार असल्याने व हे कार्यरत वायरमन शक्यतो मुख्यालयी हजरच राहत नसल्याने गावातील रोहित्रावरील साधा फ्युजही गेला तरी फ्यूज टाकण्यासाठी कर्मचारी हजर राहत नसल्याने असेही अनेक गावे कितीतरी वेळ अंधारात काढत आहेत. अनेक गावात झीरो वायरमन गावगाडा चालवली असल्याने एखाद्या वेळी त्याचा जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोणाची? असेही बोलले जात आहे