जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपचारासाठी डॉक्टर्स आणि रुग्णांकडून रेमडिसीवीरची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या औषधाचा शासकीय व खासगी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्याला १० हजार रेमडिसीवीर इंजेक्शन देण्यात यावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २०० बेड्स वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहा एमडी आणि चार ॲनेस्थेशिया तज्ज्ञांची आवश्यकता आहे. मुंबई येथील तीन आणि लातूर येथील एक डॉक्टर नंदुरबार येथील स्थानिक रहिवासी असून, येथे सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता दोन महिन्यांसाठी या डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोविड केअर सेंटरसाठी पाच कोटींची मागणी
जिल्ह्यात तळोदा येथे ५०, नवापूर येथे ५०, नंदुरबार येथे १००० आणि शहादा येथे १०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून, आवश्यक सुविधांची निर्मिती व इतर अनुषंगिक बाबींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांनी मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही यंत्रणेला दिले होते, तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक बाबींची माहिती घेऊन आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी शासन स्तरावरून सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले होते. त्यानुसार त्यांनी त्वरित आवश्यक बाबींचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.