नंदुरबार : पाचवी ते बारावीच्या शाळ सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळांमध्ये येण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शैक्षणिक नुकसानदेखील होत असून ग्रामीण भागातील बस फेऱ्यांसह मानव विकास मिशनच्या बसेसही सुरू करण्याची मागणी होत आहे.
नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत, तर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. परंतु ग्रामीण भागात एसटी बसेससह मानव विकास मिशनच्या बसेस देखील सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे रोजगार बुडालेल्या सर्वसामान्य कुटुंबांना दररोज भाडे खर्च करून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे शक्य नाही. काही भागात बससेवा सुरू झाली असली तरी शाळेच्या वेळेत फेऱ्या नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळापत्र पूर्वीप्रमाणे अर्थात लॅाकडाऊनच्या आधी होते त्या प्रमाणे सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
अनेक मार्गांवर एकही फेरी नाही...
n जिल्ह्यातील अनेक मार्गांवर एसटीची एकही फेरी नसल्याचे दिसून येते. ज्या मार्गावर उत्पन्न मिळू शकेल अशाच मार्गावर फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशा भागात विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. खासगीवाहनेदेखील शाळेच्या वेळेत राहत नसल्याने विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहे.
शाळेच्या वेळेनुसार होते आधी एसटीचे वेळापत्रक...
n लॅाकडाऊनच्या आधी शाळांच्या वेळेप्रमाणे एसटीचे ग्रामीण भागातील वेळापत्रक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते सोयीचे ठरत होते. लॅाकडाऊननंतर मात्र बस बंद झाल्या. नंतर सुरू झाल्या तर वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे अनेक मार्गांवर दिवसातून एक किंवा दोनच फेऱ्या होतात.
n विद्यार्थिनींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस देखील सुरू केलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना सवलत पासची सोय करण्यात आली असली तरी वेळेवर बसेस नसल्यामुळे त्या पासचाही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे.