नंदुरबार : किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसह व्यावसायिकांचीही मोठी धावपळ झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. काही ठिकाणी पोलिसांना दंडुकाही उगारावा लागल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात १ तारखेपासून संचारबंदी लागू आहे. राज्य शासनाने १५ तारखेपासून संपूर्ण संचारबंदी लागू केली. या कालावधीत आतापर्यंत सकाळी आठ ते दुपारी १ वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. परंतु, बुधवारपासून नवीन आदेशाप्रमाणे सकाळी ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. बुधवारी सकाळी अनेक लहान व्यावसायिकांना, फेरीवाल्यांना त्याची माहिती नव्हती. त्यामुळे सकाळी ११ वाजता पोलिसांचे वाहन तसेच पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरताच व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली. एवढ्या लवकर दुकाने बंद करावी लागत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी नेहमीप्रमाणे साडेनऊ, दहा वाजता दुकाने सुरू केली. मात्र, एक ते दीड तासातच बंद करावी लागल्याने त्यांचा व्यवसाय झाला नाही. पोलिसांनी पहिला दिवस असल्याने व्यावसायिकांना दुकान बंद करण्यास काही वेळ दिला. त्यामुळे सव्वा अकरापर्यंत मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट झाला. काही ठिकाणी त्यानंतरही हातगाडीवाले, फेरीवाले दिसून आल्याने पोलिसांना दंडुका उगारावा लागल्याचेही चित्र होते.