नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ७५४ जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा तीन टक्क्यांवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याचा २१ टक्के असलेला जन्मदर हा १९ टक्क्यांवर आला आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये काेरोनाचा शिरकाव झाला होता. यातून सुरू झालेले लाॅकडाऊन अनेक बाबींमुळे त्रासदायकही ठरले. यात प्रामुख्याने नोकरी जाणे, कोरोना आजार होण्याचा मानसिक तणाव, वाढीव खर्च यामुळे अनेकांनी फॅमिली प्लॅनिंग करत मूल उशिरा जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील विवाहसोहळे पुढे ढकलेले गेले. याचा परिणाम थेट जिल्ह्यातील जन्मदरावर झाला आहे. २०२०-२०२१ या वर्षात चार हजार २८९ बालकांनी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये जन्म घेतला, तर कोरोनासह विविध आजारांनी सुमारे साडेसहा हजारपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा मृत्युदर हा तीन टक्क्यांवर आला आहे. कोरोनामुळे कमी झालेला जन्मदर चिंतेची बाबही आहे.
विवाहसोहळे घटले
कोरोनापूर्वी जिल्ह्यात वर्षाला साधारण अडीच ते तीन हजारपेक्षा अधिक विवाहसोहळे होत होते. छोट्या-मोठ्या प्रमाणात होणारे हे साेहळे कोरोना संसर्गाच्या भीतीने कमी झाले आहेत. कारवाईच्या भीतीने अनेकजण घरगुती पद्धतीने विवाह करत आहेत, तर काहींनी उपवर मुलामुलींची विवाह काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय नाइलाजाने घेतला आहे.
जन्मदर घटला
२१.१ जन्मदर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर यंदाच्या वर्षात १९ टक्के झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातून कोरोना महामारीचे दुष्परिणाम गंभीर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक केंद्रांकडून विविध सोयी गर्भवती मातांसाठी झाल्या आहेत.