कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड. सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, नगराध्यक्ष हेमलता पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, तहसीलदार मंदार कुलकर्णी, दिलीप नाईक, अजित नाईक, दीपक नाईक, ॲड. गोवाल पाडवी आदी उपस्थित होते.
प्रसंगी ॲड. पाडवी म्हणाले की, राज्यातील आदिवासी बांधवांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येणार असून, १२ हजार नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ हजार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लालबारी, तीनटेंभा, देवळफळी आणि नयाहोंडा येथील ८९२ कुटुंबांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. त्यांच्या हस्ते नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. वळवी व आमदार शिरीषकुमार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे आवाहन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी केले.