साधारणत: दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या. परंतु न्यायालयाच्या ओबीसी आरक्षण रद्दच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने त्या जागांवर पुन्हा निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गट व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. निवडणूक रद्द व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. परंतु निवडणुकीचा घोषित झालेला कार्यक्रम कायम करण्यात आला. त्यानुसार आता सर्वच राजकीय पक्षांनी तुल्यबळ उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीच्या विजयाच्या गणितावरच पुढील सत्तेचे समीकरण ठरणार असल्याने या पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व असल्याचे समजते. त्यामुळे गेल्यावेळेस झालेल्या चुरशीच्या लढती दीड वर्षानंतर पुन्हा पाहायला मिळणार आहेत. काही इच्छुकांनी नामांकन दाखल करण्याअगोदरच मतदारांच्या गाठीभेटी घेऊन चाचपणी केली. त्यातून काढलेल्या अंदाजानुसारच उमेदवारी दाखल करावी की नाही, हे ठरवले जात आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या म्हसावद, लोणखेडा, पाडळदा, कहाटूळ हे चार गट, तर सुलतानपूर, खेडदिगर, मंदाणे, डोंगरगाव, मोहिदेतर्फे हवेली, जावदेतर्फे बोरद, पाडळदे, शेल्टी या आठ गणांतील मतदार पुन्हा नवा कारभारी निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जि. प. गटनिहाय मतदार संख्या अशी : म्हसावद १७ हजार ९२०, लोणखेडा १७ हजार ७९७, पाडळदा १९ हजार ६७३, तर कहाटूळ जि. प. गटात १८ हजार ८१७ मतदार आहेत. चारही गट मिळून एक लाख १७ हजार ४०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.