तालुक्यातील रायंगण नदीवर होलीपाडानजीक लघु बंधाऱ्यावरील फळ्या न काढल्याने मोठा पाऊस आल्यास शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. शेजारील शेतातील पीक, घरे, गाई, म्हैशीदेखील यात वाहून जातील, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
याबाबत पाटबंधारे अभियंते वट्टे यांना विचारणा केली असता, त्यांनी अजब-गजब उत्तर दिले. टेंडर टाकण्यात आले आहे. टेंडर ओपन झाल्यास ठेकेदाराकडून हे काम केले जाईल. जुलै महिना संपला असला, तरी पाट्या काढण्याच्या टेंडरचे मुहूर्त पाटबंधारे विभागाला मिळेना. पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा मोठी दुर्घटना घडल्यास संबंधित विभागास जबाबदार धरावे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तालुक्यातील रायंगण नदीवरील साठवण बंधाऱ्यावरील पाट्या पावसाळ्यापूर्वी काढणे गरजेचे होते. परंतु संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाट्या न काढल्याने पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास अनेक गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांबाबत फोनवर माहिती दिली असता, तरी उपायोजना करण्यात आली नाही.
- तानाजीराव वळवी, सामाजिक कार्यकर्ते, पांघराण