कोरोना लसीकरणाच्या दुसरा टप्पा गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आला आहे. दुसरा टप्प्यात पोलीस दलातील कर्मचारी, महसूल विभाग व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर नोंदणी झालेल्यांना लसीकरण केले जात आहे.
एसटी महामंडळातील चालक व वाहक यांच्या दररोज बस फेरी दरम्यान विविध ठिकाणच्या प्रवाशांची थेट संपर्क येतो. वास्तविक पहिल्याच किंवा दुसऱ्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळातील चालक,वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या समावेश केला पाहिजे होता. कारण कोरोना काळात काही महिने बससेवा ठप्प होती. मात्र त्यानंतर पूर्ण क्षमतेने बससेवा शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली. बसेस सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशी बस प्रवासाला पसंती देत प्रवास करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवासी बसमध्ये प्रवास करताना दिसून येत आहेत. ४४ आसन क्षमता असलेल्या बसमध्ये ८० ते १०० प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. एवढी गर्दी बघता बसमधील चालक व वाहकांना प्राधान्याने लस देणे गरजेचे होते, मात्र असे झाले नसल्याने चालक व वाहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात कोरोनाचे संक्रमण वाढू नये, म्हणून मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल सेवेला पर्याय म्हणून बेस्ट बसच्या माध्यमातून बसफेऱ्याद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. बेस्ट बसवर पडणारा ताण व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विविध आगारातून कर्मचारी मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी गेले होते. शहादा आगारातून देखील टप्प्याटप्प्याने सर्वच कर्मचारी सेवा देण्यासाठी गेलेले होते. आठ ते पंधरा दिवस सेवा देऊन आल्यानंतर शहादा आगारातील सुमारे २५ ते ३० कर्मचाऱ्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात वय वर्ष ५२ असलेले वाहक यशवंत तुकाराम सोनवणे या कर्मचाऱ्याच्या कोरोनाची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. राज्यभरातील अनेक चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली होती. वरील चित्र पाहता कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे महत्त्वाचे होते. मात्र परिवहन कर्मचाऱ्यांच्या संदर्भात लसीकरणाबाबत अजून कोणतेही नियोजन नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
प्राथमिक शाळा बंद असून देखील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आधी प्राधान्याने लस दिली गेल्याने आचार्य व्यक्त होत आहे. प्राथमिक शाळा बंद आहेत. त्या कधी सुरू होतील याचे सूतोवाच नाही. असे असताना देखील प्राथमिक शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यात सामील केले गेले आहे. शिक्षकांचे लसीकरण देखील सुरू झाले,मात्र एसटी बसमध्ये प्रत्येक प्रवाशांशी थेट संपर्क येत असूनही चालक वाहकाला लस दिली गेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
एसटी बस म्हटले म्हणजे सर्व प्रकारचे नागरिक प्रवासी म्हणून प्रवास करू शकतात. विविध ठिकाणावरून नागरिक एसटीने प्रवास करतात. यात वाहकाचा प्रवाशांशी थेट संबंध येत असल्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याच्या मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देखील सुरू झाल्याने ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी एसटी बसने शिक्षणासाठी प्रवास करत आहेत. हे सर्व चित्र बघता एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देणे गरजेचे ठरणार आहे.
एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना लस देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून याकडे अजून प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे लसीकरण संदर्भात नियोजन करणाऱ्या यंत्रणेने याबाबत विचार करून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना लस द्यावी, अशी मागणी होत आहे.