सध्याचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातल्यावर शिक्षण विभागाने मुलांना प्रत्यक्षात शाळेत जाता येत नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. कोरोना महामारीत सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. पालकांनीही कुवतीप्रमाणे आपल्या मुलांना स्मार्ट मोबाईल घेऊन दिला. मात्र कुकावल व कोठली येथे ऑनलाइन शिक्षणाची पाणी असून, तहानल्यासारखी होऊन गेली आहे. कारण शहादा तालुक्यातील कुकावल आणि कोठली ही दोन्ही गावे जवळ असून दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीकाठी खासगी कंपनीचे टॉवर असून, अधूनमधून नेटवर्क गायब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणास अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा नेटवर्क गायब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनसाठी ॲपवर जॉईन होताना खूपच उशीर लागतो आणि विद्यार्थी जॉईन झालेच तर शिक्षक काय शिकवित आहे हे रेंजअभावी तुटक आवाज येत असल्याने विद्यार्थ्यांना समजत नाही. दोन्ही गावांमध्ये नेटवर्कची समस्या येत असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या धर्तीवर अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. शिवाय आता कोरोना महामारीमुळे अनेक कामे प्रत्यक्षात ऑफिसात जाऊन न करता मोबाइलद्वारे वीज बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे, रिचार्ज मारणे यासारख्या अनेक गोष्टी घरबसल्या होत असतात. मात्र, येथील मोबाइल टॉवरचे नेटवर्क मधूनच गायब होत असल्यामुळे कुकावल व कोठलीवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही गावांमधील अनेक विद्यार्थी शहादा, दोंडाईचा, वडाळी, बामखेडा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळा चालू होऊन दीड महिने उलटल्यावर आता पहिली घटक चाचणी सुरू होण्याची वेळ येऊन गेली आहे, तरी अजून शाळा चालू होण्याची कोणतीच लक्षणे दिसत नसल्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र कुकावल आणि कोठली येथील विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
उधार उसनवारीने पैसे गोळा करून आम्ही आमच्या मुलांना स्मार्ट मोबाइल घेऊन दिला आहे. मात्र आमच्या गावाजवळ टॉवर असूनदेखील नेटवर्कच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. दोन दिवसांवर मुलांची पहिली घटक चाचणी सुरू होणार असून पुन्हा-पुन्हा नेटवर्कची समस्या उद्भवल्यास पेपर सोडवता येईल का? असे प्रश्न मुलांकडून विचारले जात आहे. - लक्ष्मण पाटील, पालक, कोठली, ता.शहादा