तळोदा : शहरातील खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांसाठी असलेले रेशन दुकान संबंधित दुकानदाराने मनमानीपणे इतरत्र स्थलांतरित केल्याने साधारणत: ४०० ग्राहकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना साकडे घातले. यावेळी गल्लीतच दुकानं सुरू करावे, अशी मागणी केली. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तळोदा शहरातील खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांसाठी प्रशासनाने स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान दिले आहे. या दुकानास या तिन्ही गल्ल्यांमधील ४०५ ग्राहकांना जोडले आहे. यात १८५ अंत्योदय व २२० ग्राहक प्राधान्य योजनेतील आहेत. हे दुकान खान्देशी गल्लीत सुरू होते; परंतु संबंधित दुकानदाराने ग्राहकांना व पुरवठा शाखेस विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने गल्लीपासून एक, दीड किलो मीटर अंतरावर असलेल्या गवळी वाडा परिसरात नेले आहे. साहजिकच यामुळे ग्राहकांना मुख्य बाजारपेठ तुडवत रेशन घेण्यासाठी तेथे जावे लागत आहे. काही वृद्ध, अपंगांना खासगी रिक्षा करून धान्य आणावे लागत आहे. साहजिकच यामुळे ५० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदार यास गल्लीतच दुकान थाटण्यासाठी ग्राहकांनी तोंडी सांगूनही साफ दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांच्यासह ग्राहकांनी सोमवारी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार गिरीश वाखारे यांच्यापुढे ग्राहकांनी कैफियत मांडली. दुकानदाराने मनमानीपणे दुकान इतरत्र हलवले आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली आहे. दुकान आमच्या परिसरातच पुन्हा सुरू करण्यास त्यास तंबी द्यावी. शिवाय धान्यही पुरेसे दिले जात नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी शहरप्रमुख जितेंद्र दुबे, आनंद सोनार, संजय पटेल, जगदीश चौधरी, विनोद वंजारी, श्रावण तीजविज, विपूल कुलकर्णी, विजय मराठे, सूरज माळी, कल्पेश सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी आदींसह ग्राहक उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार गिरीश वाखारे यांनी याप्रकरणी चौकशी करून तेथेच दुकान सुरू करण्याची सूचना दुकानदारांस देण्याचे आश्वासन दिले.
पुरवठा शाखेने केली चौकशी
खान्देशी गल्ली परिसरातील नागरिकांनी आपल्या हक्काचे रेशन दुकान इतरत्र नेल्यामुळे सोमवारी सकाळी तहसीलदारांना साकडे घातल्यानंतर येथील पुरवठा शाखा खळबडून जागे झाले. त्या दिवशी दुपारीच पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी यांनी खान्देशी गल्ली परिसरातील ग्राहकांची भेट घेऊन प्रत्यक्ष चौकशी केली. त्यांनी दुकानदाराने येथून दुकान हलविल्यामुळे प्रचंड गैरसोयीस तोंड द्यावे लागत असल्याची व्यथा मांडली. शिवाय नियमानुसार धान्य देण्याची मागणीदेखील ग्राहकांनी त्यांच्यापुढे केल्याचे ग्राहकांनी सांगितले. दरम्यान, ज्या ठिकाणी दुकानदार दुकान चालवीत होता. ते घर भाड्याचे होते. पावसात ते गळत होते. शिवाय घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले होते. त्यामुळे दुकान दुसरीकडे हलवावे लागल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी त्या परिसरातच स्वस्त धान्य दुकान असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित दुकानदारांस घर शोधून पुन्हा तेथेच दुकान सुरू करण्याची सूचना दिली आहे. -गिरीश वाखारे, तहसीलदार, तळोदा.