नंदुरबार : कोरोना काळात आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, नगरपालिका व स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन केले नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस विभागातर्फे देण्यात आला आहे. यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले असून कायदेशीर कारवाई व दंडाचेही प्राविधान करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एक पत्रक जारी केले आहे. त्यात विविध कार्यक्रम, बाजाराचे ठिकाण, सार्वजिनक ठिकाण येथे नियमांचे पालन न झाल्यास काय कारवाई होऊ शकते, याची माहिती देण्यात आली आहे.
लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. मंगल कार्यालय, लॅान्स, हॅालच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणे व ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्यास संबंधित कार्यालयाचे व्यवस्थापक, आयोजक व उपस्थितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
उपाहारगृह, बार, कॅफे सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक असेल.
भाजीपाला मार्केट, शॅापिंग कॅाम्प्लेक्स, मॉल या ठिकाणी सर्वांना मास्क लावणे बंधनकारक राहील.
घराबाहेर पडतांना, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क लावणे बंधनकारक राहील.
रेल्वे व सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविता येणार नाहीत. दंडात्मक कारवाई केली जाईल. मास्कशिवाय प्रवास करता येणार नाही. सिनेमागृहातही हा नियम राहील. शाळा, महाविद्यालयांमध्ये सर्व कर्मचारी, विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक राहील. हात धुण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, संशयित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. खासगी कोचिंग क्लासेसमध्ये देखील या सर्व बाबींची अंमलबजावणी आवश्यक राहील.