या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच दिल्ली आणि केरळ येथे हिंदूंंच्या हत्या झाल्या आहेत. देशाच्या राजधानीत अशा घटना दिवसाढवळ्या घडत असतील तर अन्यत्र काय स्थिती असेल, याचा विचारच करू शकत नाही. दिल्ली येथील घटनेतील रिंकू शर्माच्या कुटुंबीयांचे सांत्वन चालू असतानाच केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राहुल कृष्णा ऊर्फ नंदू याची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आली आहे. हिंदूंच्या हत्यांमागील सूत्रधार, यात सहभागी गुन्हेगार, या हत्यांमध्ये साहाय्य करणारे धर्मांध यांच्यावर तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस वा राजकीय नेते यांचा माग काढून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. हे निवेदन नंदुरबार येथील हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागूल, राहुल मराठे, आकाश गावित, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे व पंकज जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
देशभरात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या रोखण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST