सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा-नांदरखेडा रस्त्यावर गौतमेश्वर मंदिरालगत गोमाई नदीवर पूल आहे. या पुलाला लोखंडी पाइपाचे संरक्षण कठडे बसवले आहेत. मात्र सध्या पाइप चोरीला जात असल्याने येथील रहदारीला धोका निर्माण झाला आहे. प्रकाशाकडून येताना तेथील लांबलचक लोखंडी पाइप काढून नेले आहेत, तर नांदरखेडाकडून येताना सुरुवातीचे पाइपदेखील भुरट्या चोरांनी चोरून नेले आहेत. संरक्षण कपडे गायब झाल्याने येथून ये-जा करणारे प्रवासी, मजूर, शेतकरी, सकाळ-संध्याकाळ फिरायला येणारे नागरिक यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी असलेले पाइप आता चोरीला जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तर ज्या ठिकाणी धोका आहे, अशा ठिकाणी पुन्हा संरक्षण कठडे बसवण्याची गरज आहे.
घटनेची पुनरावृत्ती कायम
पूल बांधून सात-आठ वर्षे झाले आहेत. या सात-आठ वर्षांमध्ये पाइप चोरी करण्याचे प्रकार तीन ते चार वेळा झाले आहेत. मागील पाच वर्षांपूर्वी सिंहस्थ पर्वणीच्या काळामध्ये चोरीला गेलेल्या पाइपांचा ठिकाणी पुन्हा नवीन लोखंडी पाइप बसवण्यात आले होते. मात्र आता पुन्हा चोरीचे सत्र सुरू झाल्याने एक एक पाइप चोरीला जात आहे. पाइप चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांचा शोध घेणे गरजेचे आहे.