लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाखांपर्यंत पोहचली असून दशवार्षिक वृद्धीदर मात्र २५ ते २६ टक्केदरम्यान कायम आहे. चिंतेची बाब म्हणजे हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण घटत असून ते आता ९४२ पर्यंत आले आहे. त्यामुळे ‘लेक वाचवा’ अभियानाला गती देणे गरजेचे ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या ७० टक्के आहे.
देशात १९६१ पासून दर दहा वर्षांनी लोकसंख्येची गणना केली जाते. त्यासाठी वर्षभर जनगणना करण्याचे काम देशापातळीवर केले जाते. यंदा गेल्या वर्षी आधुनिक पद्धतीने जनगणना करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या शिरकावमुळे जनगणनेचे काम रखडले आहे. त्यामुळे या कामाला कधी सुरूवात होईल व यावेळची दशवार्षिक लोकसंख्या किती वाढली हे कळण्यास आणखी काही कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.
वृद्धीदर २५ टक्केपर्यंत
जिल्ह्याचा लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धीदर हा यावेळीही २५ ते २६ टक्केच्या दरमन्याच राहिला आहे. १९६१ पासून दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर पाहिला तर १९६१ मध्ये २५.३१होता. १९७१ मध्ये तो घटून २१.४५ टक्के झाला. १९८१ च्या जनगणनेत २२.४६ टक्केवर पोहचला. १९९१ मध्ये वाढून वृद्धीदर २५.३० टक्के झाला. २००१ मध्ये कमी होऊन २३.३८ टक्के झाला तर २०११ मध्ये पुन्हा २५ टक्केच्या वर अर्थात २५.६६ टक्के झाला. २०२१ अर्थात आता अंदाजे लोकसंख्या वृद्धीदर जवळपास २५.६० टक्के इतका आहे.
लोकसंख्येतील तफावती आणि असमतोल...
n जनगणना करताना जिल्ह्यात नागरी आणि ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले आहेत. नागरी भागात शहरांची संख्या नऊ आहे. त्यात नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांच्या शहरांसह वडफळ्या, खापर, खांडबारा, मक्राणीफळी या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. नंदुरबार अ वर्ग पालिका, शहादा ब वर्ग पालिका तर नवापूर व तळोदा क वर्ग पालिकेत असून खापर, वडफळ्या, खांडबारा, मक्राणीफळी, अक्कलकुवा या गणना शहरांचा समावेश आहे.
nनंदुरबार जिल्हा आदिवासी लोकसंख्या बहुल जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. एकूण लोकसंख्येच्या ७० टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. त्यात २०११ च्या जनगणनेनुसार अक्कलकुवा तालुक्यात ८५.२५ टक्के, धडगाव तालुक्यात ९५.९४ टक्के, तळोदा तालुक्यात ७७.४४ टक्के, नवापूर तालुक्यात ८५.८२ टक्के, नंदुरबार तालुक्यात ४५.५७ तर शहादा तालुक्यात ५४.२० टक्के लोकसंख्या आहे. त्यात नवीन जगनणनेत आणखी भर पडणार आहे.
n२०२१ ची जनगणना ही आधुनिक पद्धतीने करण्यात येणार होती. त्यासाठी तयारीही करण्यात आली होती. संबंधित घटकांची काही प्रशिक्षणे देखील झाली होती. साधारणत: मे २०२० मध्ये जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार होते. परंतु देशात मार्च २०२० पासूनच कोरोनाचा शिरकाव झाल्याने जनगणना स्थगित करण्यात आली आहे. आता केव्हा ती सुरू होते व नवीन आकडेवारी समोर येते याकडे लक्ष लागून आहे.