लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोणा या विषाणूजन्य साथरोगाचा प्रसार गर्दीतून होत असल्याने खबरदारी म्हणून यावर्षी १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सामूहिक कार्यक्रम न घेता व्यक्तिगत घरोघरी जयंती साजरी करण्याचा निर्णय शहाद्यातील आंबेडकरी अनुयायींनी घेतला आहे.सध्या संपूर्ण जगासह भारतातही कोरोणाचे संकट आले आहे. महाराष्ट्र राज्यातील जनताही या साथ रोगाशी झुंजत आहे. केंद्र व राज्य सरकारने कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. येत्या १४ एप्रिल पावतो संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनद्वारे गर्दी कमी करून कोरोणाची साखळी खंडित करणे हा हेतू आहे. यामागील एकमेव उद्देश सामूहिक गर्दी कमी करणे असा आहे.१४ एप्रिल म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस. यानिमित्त आंबेडकरी अनुयायी दरवर्षी विविध कार्यक्रमांसह मिरवणुकीचे आयोजन करतात. या वेळी अभिवादनासह मिरवणूक, प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, भीमगीत, व्याख्यान आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यात मोठ्या संख्येने सारेच भीमअनुयायी एकत्र येतात. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करून कोरोणाच्या साखळीला खंडित करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवत १४ एप्रिलला आपापल्या घरी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती साजरा करण्याचे नियोजन आंबेडकरी जनतेने केले आहे. यादिवशी घरावर पंचशील किंवा झेंडा ऊभारून भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस आदरांजली अर्पण करत बुद्ध , धम्म, भीम वंदन पठणासह वैयक्तिक ग्रंथ वाचनासारखे कार्यक्रम घेऊन कोरोणाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. आंबेडकरी अनुयायींनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा घरीच साजरा करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:16 IST