लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : फलज्योतीष विज्ञान आहे का? या विषयावर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विज्ञानबोध वहिनी विभागाचे राज्य कार्यवाहक प्रा.डॉ.नितीन शिंदे आणि बृहन महाराष्ट्र ज्योतीष मंडळ पुणेचे ज्योतीषरत्न नंदकिशोर जकातदार यांच्यात वाद-संवाद हा कार्यक्रम रंगला.कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगानचे माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्योतिषशास्त्र हा विज्ञानाचा पाया आहे असे सांगून ज्योतिषशास्त्र एका विशिष्ट वर्णात अडकल्याने त्याचा विकास होऊ शकला नाही. जिथे संवाद असतो तिथे शास्त्र असते, शास्त्र नियमावर आधारित असते तर विस्मृतीत येणारे ज्ञान म्हणजे विज्ञान. धर्म म्हणजे संस्कार म्हणूनच माणूस धर्माप्रमाणे जगतो. प्रारब्ध म्हणजे माणसाचे कर्म असते. ज्योतिष शास्त्रातील भोंदूगिरीवर त्यांनी नापसंती व्यक्त करून ही भोंदूगिरी थांबली पाहिजे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास न करता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते केवळ काही गोष्टींचा बाऊ करून उलट समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात, असा आरोपही त्यांनी केला. तर आपली भूमिका मांडताना डॉ.नितीन शिंदे यांनी पीपीटीद्वारे नक्षत्र, ग्रह, तारे, राशी यांचा मानवी जीवनावर काडीचाही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले. राशी म्हणजे काय? पत्रिका म्हणजे काय? सामान्य माणसाला याचे काहीही ज्ञान नसते. परंतु तरीही लोक लग्न जुळवताना पत्रिका बघतात, राशिभविष्य बघतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. हजारो किलोमीटर लांब असलेले ग्रह माणसाच्या जीवनात काहीही करू शकत नाही. नक्षत्र, राशी या संकल्पना बरोबर असल्या तरी त्याचा संबंध माणसाची जोडणे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.डॉ.के.बी. पाटील यांनी ज्योतिषशास्त्रातील कर्मकांड थांबवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. या वेळी बृहन महाराष्ट्र ज्योतिषी मंडळाच्या कार्याध्यक्षा मालती शर्मा, आनंद कुलकर्णी, नयना जकातदार, शैलेश देशपांडे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ.रवींद्र टोणगांवकर, डॉ.शशांक कुलकर्णी, डॉ.अलका कुलकर्णी, हैदरअली नुरानी, डॉ.विश्वास पाटील, सरकारसाहेब रावल, डॉ.सुभाष फुलंब्रीकर, डॉ.दर्शन कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अंनिसचे विनायक सावळे यांनी केले.
फलज्योतीषावर शहाद्यात रंगला वाद-संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:39 IST