लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या लघुप्रकल्पाची पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढून १०० टक्के भरल्याने ओसंडून वाहत होते. मात्र लघुप्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गळती लागून भगदाड पडले आहे. येणाऱ्या पावसाळ्यात काही अघटीत झाल्यास धरण लगतच्या सात गावांना धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे.यावर्षी समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील सर्वच धरणे, लघुप्रकल्प भरले होते. तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेला लघुप्रकल्पही भरून ओसंडून वाहत होता. मात्र लघुप्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. या भिंतीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रार करूनही अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. लोंढेरे गावालगत असलेले प्रकल्पाचे काम सन १९९९ ला पूर्ण झाल्यानंतर हे पाणी कुकावल, कोठली, लोंढरे या गावांच्या परिसरातील शेतकºयांना शेतीसाठी व पिण्यासाठी उपयोगी पडते. या धरणातील ओसंडून पाहणारे पाणी लगतच्या चार नाल्यांमधून सोडून ते शेती उपयोगासाठी वापरण्यात येते. यावर्षी २६३ हेक्टर जमीन लघुप्रकल्पाच्या पाण्याने ओलिताखाली आली आहे त्याचा फायदा परिसरातील शेतकºयांना उत्तमरित्या झाला आहे. सुमारे १३ वर्षाअगोदर हा प्रकल्प पूर्ण भरला होता. त्यानंतर यंदा झालेल्या पावसाळयात तो प्रकल्प पूर्ण भरला होता. अतिवृष्टीमुळे १०० टक्के भरल्याने सांडव्यातून पाणी वाहून गेले. गेल्या १३ वर्षात पाणी न आल्याने प्रकल्पाच्या भिंतीला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी मोठे वृक्षही आहेत. त्यामुळे प्रकल्पाची भिंत कमजोर झाली असून काही ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. प्रकल्पाची परिस्थिती पाहिली असता भिंत जर अचानक तुटली तर लोंढरे जयनगर, निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळे, कुकावल, कोठली या सात गावात पाणी शिरून तेथील लोकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धरणातील सांडव्याच्या भिंतीची दुरुस्तीबाबत लोंढरे, कहाटूळ, जयनगर या परिसरातील नागरिकांनी वारंवार लघुपाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून तक्रारी करूनही जनतेच्या तक्रारींना यश आले नाही.याबाबत गेल्या अनेक महिन्यापासून ग्रामस्थांनी निवेदन देऊनही लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. या प्रकल्पाच्या गळतीमुळे परीसरातील सात गावांना धोका असताना लघुपाटबंधारे विभाग निद्रीस्त अवस्थेत का आहे? असा सवाल नागरिकांनी केला आहे. नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त होत आहे. लघुप्रकल्पाची दुरुस्ती युद्धपातळीवर संबंधित विभागाने करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात निवेदन देण्यात येईल, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
लोंढरे लघुप्रकल्पाची भिंत धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:41 IST